जिद्द, कौशल्य आणि योग्य प्रयत्नांतून करिअर घडवा : डॉ. पी. आर. भोसले
संजीवनमधील प्रथम वर्ष पदविका विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात

जिद्द, कौशल्य आणि योग्य प्रयत्नांतून करिअर घडवा : डॉ. पी. आर. भोसले
संजीवनमधील प्रथम वर्ष पदविका विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात
पन्हाळा : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
सोमवार पेठ, पन्हाळा येथील संजीवन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या पदविका विभागात प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संस्थेचे चेअरमन डॉ. पी. आर. भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव एन. आर. भोसले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. पॉलीटेक्निक विभागाचे प्राचार्य प्रा. निशांत थरकार यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पी. आर. भोसले म्हणाले, “विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत आपल्या करिअरकडे गांभीर्याने पाहून ते योग्य पद्धतीने घडवावे. मनात जिद्द आणि यश मिळवण्याची इच्छा असेल, तर गरिबी किंवा प्रतिकूल परिस्थिती अडथळा ठरत नाही. प्रामाणिक प्रयत्न आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर यश निश्चित मिळते.”
सहसचिव एन. आर. भोसले यांनी विद्यार्थ्यांना दहावीनंतरचा काळ अत्यंत महत्त्वाचा असल्याचे सांगितले. “हे वय करिअर घडवण्याचे आहे. विद्यार्थ्यांनी चुकीच्या मार्गाला न लागता आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिस्थितीची जाणीव असल्याने ते मेहनतीच्या जोरावर जीवनात मोठे यश मिळवू शकतात,” असे त्यांनी सांगितले.
संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. अतुल आयरे यांनी संस्थेने केलेल्या विविध सामंजस्य करारांची माहिती देत नोकरीच्या संधींसाठी आवश्यक असलेली कौशल्ये विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत आत्मसात करावीत, असे आवाहन केले. पदवी विभागाचे प्राचार्य डॉ. संजीव जैन यांनी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पालक प्रतिनिधी म्हणून मारुती पोवार व प्रभाकर फाटक यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. एकनाथ साळोखे, रजिस्ट्रार दीपक पाटील, डॉ. गजानन कोळी, डॉ. अजित काटकर, प्रा. तौफिक मुल्ला, प्रा. शुभम पाटील, प्रा. अरविंद भंडारे, प्रा. धनंजय पाटील, प्रा. राजेंद्र खोपडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख, शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.सूत्रसंचालन एम. सी. कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रा. विद्याश्री खोत यांनी मानले.




