ताप, खोकला वाढलाय ? घाबरू नका ; ‘स्वाइन फ्लू ’बाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर)चे आवाहन

ताप, खोकला वाढलाय ? घाबरू नका ; ‘स्वाइन फ्लू ’बाबत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर)चे आवाहन
नवी दिल्ली : एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क
देशात सध्या वाढणाऱ्या श्वसनविकारांच्या पार्श्वभूमीवर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) महत्त्वाची माहिती दिली आहे. सध्या पसरत असलेला इन्फ्लुएन्झा ‘ए’ (एच१एन१) हा कोणताही नवा किंवा धोकादायक प्रकार नसून जुन्याच स्वरूपातील विषाणू आहे, असे शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.
‘आयसीएमआर’च्या ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी केलेल्या जनुकीय तपासणीनुसार, सध्या आढळणारा विषाणू ‘ए/मिसूरी/११/२०२५ (एच१एन१) pdm09’ या स्ट्रेनशी मिळताजुळता आहे. हा विषाणू ‘क्लेड 6B.1A.5a2a’ आणि ‘सबक्लेड D.3.1.1’ या गटातील असून, तो गेल्या वर्षापासूनच जगभरात आणि भारतात सक्रिय आहे. जागतिक आरोग्य संघटनेने उत्तर गोलार्धासाठी शिफारस केलेल्या सध्याच्या नियमित फ्लू लसी या विषाणूवर पूर्णपणे प्रभावी ठरत असल्याचे संशोधनात समोर आले आहे.
हवामानातील बदल, पावसाळ्यातील दमट वातावरण आणि हवेतील गारवा यामुळे दरवर्षी या ऋतूमध्ये सर्दी, खोकला आणि फ्लूच्या रुग्णांमध्ये नैसर्गिकरीत्या वाढ होते. हा हंगामी फ्लू सामान्यतः शरीराची रोगप्रतिकारशक्ती सक्रिय झाल्यावर ठरावीक दिवसांत आपोआप बरा होतो. यामध्ये प्रामुख्याने मध्यम ते तीव्र ताप, सतत खोकला, घसा खवखवणे किंवा दुखणे, तीव्र डोकेदुखी, थकवा आणि अंगदुखी अशी लक्षणे दिसून येतात. बहुसंख्य रुग्ण योग्य विश्रांती, पुरेसे कोमट पाणी, सकस आहार आणि घरगुती काळजी घेतल्यास चार ते पाच दिवसांत पूर्णपणे बरे होत आहेत.
मात्र लहान मुले, ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला तसेच मधुमेह, रक्तदाब, दमा, मूत्रपिंड किंवा हृदयविकार यांसारख्या जुनाट आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. अशा व्यक्तींमध्ये संसर्ग वाढल्यास छातीत कफ भरणे किंवा न्युमोनियासारखी गुंतागुंत निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे ताप तीन दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास, श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यास, छातीत दुखत असल्यास किंवा प्रचंड अशक्तपणा आल्यास स्वतःच्या मनाने औषध दुकानातून गोळ्या न घेता तातडीने तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
देशभरातील आरोग्य यंत्रणा या स्थितीवर पूर्ण लक्ष ठेवून असून रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधसाठा उपलब्ध आहे. संसर्ग रोखण्यासाठी खोकताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करावा, बाहेरून आल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावेत, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि फ्लूची लक्षणे दिसल्यास इतरांच्या संपर्कात न येता घरीच विश्रांती घ्यावी, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.




